जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील १८०० शाळांमधील मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता आणि नियमितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, जिल्ह्यातील सर्व शाळांना आता दररोज जिओ-टॅगिंगसह मध्यान्ह भोजनाचे फोटो काढून व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवणे बंधनकारक असणार आहे. या माध्यमातून भोजनाच्या वितरणात अधिक पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन ठरवून दिलेल्या प्रमाणाप्रमाणे आणि मेनूनुसार दिले जाणे आवश्यक आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी सीईओ मिनल करनवाल यांनी हे अभिनव पाऊल उचलले आहे.
या संदर्भात त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे मुख्याध्यापक दररोजचे फोटो अपलोड करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या उपक्रमामुळे मध्यान्ह भोजनाच्या वितरणात शिस्तबद्धता येईल आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पोषण सुरक्षिततेची खातरजमा होईल.
यासोबतच, प्रत्येक तालुक्याच्या पोषण आहार अधीक्षकांना ग्रुपवर आलेल्या छायाचित्रांची मोजणी करून त्यांची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, फोटो काढताना भोजनासाठी वापरण्यात आलेले पदार्थ स्पष्ट दिसतील याची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पोषणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल आणि त्यांना नियमितपणे सकस आहार मिळेल अशी अपेक्षा आहे.