मुंबई, (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात एका बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राज्यातील विविध यंत्रणांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार कामे तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये येऊन, तात्काळ आणि पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून मंजूर कामांना गती द्यावी.
शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी विहित कालावधीत खर्च होईल यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून अंमलबजावणी करावी, असेही महाजन यांनी अधोरेखित केले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ग्रामीण भागामध्ये पुरवण्यात आलेल्या साधनसामग्रीचा उपयोग करून घेण्यासाठी ग्रामस्तरावर ग्रामजागृती आणि साहित्य वापरासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या समिती कक्षात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, जलसंपदा विभागाचे सहसचिव रा.अ. काटपल्लीवार, मृदू व जलसंधारण विभागाचे सहसचिव वी. म. देवराज, महावितरणचे कार्यकारी संचालक द. वी. पडळकर, खार भूमी विभागाचे कार्यकारी अभियंता वी. पा. पाटील, वित्तीय सल्लागार व सहसचिव अरुण कोल्हे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव द. ह. कदम, आपत्ती व्यवस्थापनाचे अवर सचिव रतनसिंह परदेशी, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, नगरविकास विभागाच्या नम्रता मुंदडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांचे क्षेत्रीय कार्यालय प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.