जळगाव, (प्रतिनिधी) : “भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते असे ही ते म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क, बांभोरी आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत डॉ. विसपुते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात ते म्हणाले की, “देवाने माणसाचे जीवन सोपे केले, पण माणसानेच ते व्यसनांच्या आहारी जाऊन कठीण, गुंतागुंतीचे बनवले आहे,” असे सांगत, व्यसनामुळे होणाऱ्या नुकसानांचे स्पष्ट चित्र उपस्थितांपुढे मांडले. व्यसनामुळे तोंड व शरीरास दुर्गंध येतो, प्रतिकारशक्ती घटते, आनंददायक संप्रेरकांची निर्मिती कमी होते आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ढासळते, असे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, ध्यानधारणा करणे, कुटुंबीयांशी संवाद वाढवणे आणि सजगता विकसित करणे हे उपाय सुचवले. विसपुते यांनी गौतम बुद्धांचा अंतिम संदेश “मोह, माया सोडा आणि सजग रहा” याची आठवण करून दिली. १९१७ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकाचा संदर्भ देत असेही नमूद केले की, व्यसनाधीनतेची स्थिती १०८ वर्षा नंतर आजही बदललेली नाही, ही खेदजनक बाब बोलून दाखविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक यांनी प्रस्तावना केली. ‘आपला एकही सहकारी व्यसनी नसावा हा विचार कंपनीचे संस्थापक श्रद्धेय (मोठेभाऊ) भवरलाल जैन यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनच करून त्यावर प्रत्यक्ष कृती केली. आज त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने देखील त्यात सातत्य ठेवले आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने व्यसने सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे…’ असे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन फुड पार्क येथील कांदा निर्जलीकरण प्रकल्पातच्या ट्रेनिंग हॉल येथे सहकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पारख तर प्रमुख पाहुणे म्हणून असलम देशपांडे, डॉ. अरुण चौधरी होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कंपनीच्या गृहपत्रिकेच्या संपादकीय मंडळाचे सदस्य किशोर कुलकर्णी यांनी केले.