यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावल तालुक्यातील किनगाव शिवारात बालकाला बिबट्याने ठार केल्यावर आता हि दुसरी घटना घडली आहे.
तालुक्यातील डांभुर्णी येथील प्रभाकर चौधरी यांच्या शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये ठेलारी समाजातील मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत. दरम्यान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई सतिश रुपनर (वय २ वर्षे) या चिमुकलीला उचलून नेले. हि बालिका आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना बिबट्याने झडप घालून तिला उचलून केळीच्या बागेत पसार झाला. त्यांनी आरडाओरडा केला असला तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पसार झाला. तर या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिच्या शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले. या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागते. यातच बिबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.