जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगिण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टीक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहिल त्यासाठी दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र समजून घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्यातर्फे रावेर येथे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. के. बी. पाटील बोलत होते. याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, माजी आमदार अरूण पाटील, केळी महासंघाचे भागवत पाटील, डॉ. संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी यांच्या हस्ते केळीचे खोड व घड याचे पूजन करण्यात आले.
यावेळी रामदास पाटील-निंबोल, विशाल अग्रवाल, प्रशांत महाजन, सदानंदन महाजन, प्रफूल्ल महाजन, उज्ज्वल अग्रवाल, हरी भिका पाटील, पांडुरंग पाटील, अतुल मधुकर पाटील, यश पाटील, अमोल पाटील-बलवाडी, शैलेंद्र पाटील-शिंगाडा, निलेश पाटील-अजंदा, मंदार मनोहर पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे वितरक सोपान पाटील, गुलाब पाटील, आर. जी. पाटील यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनतर्फे मान्यवरांचे रूमाल टोपी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर केळी व केळीच्या ज्यूस चे वाटप केले गेले. यावेळी केळी दिनानिमित्त विशेष सजावटीसह तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर शेतकऱ्यांसह नागरिकांनी सेल्फी काढले.
जागतिक केळी दिन सर्वप्रथम युरोपीयन व अमेरिकियन देशांमध्ये साजरा केला जातो. केळी फळातील पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचे सेवन वाढावे यासाठी केळी दिवस साजरा करण्यामागील भूमिका तसेच जागतिकस्तरावर केळीला अन्नघटकांपैकी महत्त्वाचे मानले जाते. प्रवासामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि खाता येणारे सुरक्षित असे फळ असल्याचे डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले. जैन इरिगेशन गेल्या चाळीस वर्षापासून केळीच्या विकासासाठी काम करत होते. ठिबक सिंचन, फर्टिगेशन, पॅकेजिंग प्रॅक्टीसेस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, केळी लागवड व काढणी पश्चात फ्रुटकेअर मॅनेजमेंट या सर्व गोष्टींमुळे केळीच्या पिकांमध्ये आज क्रांती झाली. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या समृद्धी आली. ईश्वराने नैसर्गिक पॅकेजिंग केलेले केळी हे फळ आहे. त्याला प्रवासासह कुठेही सेवन करता येते. ती नैसर्गिक रित्या आरोग्याला सुखकर आहेच निसर्गाचं सुद्धा पालन पोषण करणारं हे फळ आहे. त्यामुळे त्याचे आरोग्याच्या दृष्टीने आहारात रोज सेवन करा असे आवाहन डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहूल भारंबे, मोहन चौधरी, चेतन गुळवे, तुषार पाटील, शुभम पाटील, भास्कर काळे, सागर मोरे, यतिश चौधरी, तुषार हरिमकर यांच्यासह जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूड्स चे सहकारी यांनी सहकार्य केले.