जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली गावात किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जळगाव तालुक्यात खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. युवराज सोपान कोळी हा आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचा गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.
काही शेतकऱ्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून युवराज यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.