जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळून लाभ होणार आहे.
वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मुळ प्रशासकीय मान्यता दि.०१ मार्च १९९९ रोजी मिळाली. मात्र सन २०१४ पर्यंत प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु होते. सन २०१४-१५ मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या व प्रकल्पास ०९ मार्च २०१८ रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. तद्नंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये ०१ जानेवारी २०१९ रोजी समावेश करण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली. अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे (बॅरेजचे) काम मार्च २०२१ रोजी पूर्ण झाले. नियोजित क्षेत्र ८२९० हे. यामध्ये चाळीसगांव तालुक्याचे २० गावे ५६८७ हेक्टर आणि भडगांव तालुक्याचे ११ गावे २६०३ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहेत.
वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपारिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता. मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२२ मध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार व शासनाच्या नविन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले पाईपलाइन प्रणालीद्वारे सिंचन या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या २ वर्षात केवळ चाळीसगावच नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी बोलताना दिली.








