जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील २७ वर्षीय तरुणाने नैराश्यातुन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर कडू साळुंखे (वय२७, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. ज्ञानेश्वर हा एरंडोल येथे एका खासगी रुग्णालयात कक्षसेवक म्हणून काम करीत होता तर ज्ञानेश्वरचे वडील कडू साळुंखे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तर ज्ञानेश्वरची आई या तांबापुरा परिसरातील अंगणवाडी केंद्रात मदतनीस आहेत. बुधवारी ज्ञानेश्वरचे पालक कामावर निघून गेले होते. तेव्हा ज्ञानेश्वर घरी एकटाच होता. यावेळी त्याने त्याच्या कॉलनीतील मित्राला फोन केला. मात्र तो झोपला असल्याने त्याने उचलला नव्हता.
नंतर मित्र झोपेतून उठला तेव्हा ज्ञानेश्वरचा आलेला कॉल पाहिला. त्याने ज्ञानेश्वरला कॉल केला असता त्याने उचलला नाही. म्हणून मित्र ज्ञानेश्वरच्या घरी गेला असता ज्ञानेश्वरने पंख्याला कपड्याने गळफास लावून घेतलेला दिसून आला. यावेळी धक्का बसलेल्या मित्राने तत्काळ त्याच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर ज्ञानेश्वरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.