जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. डॉ. अमोल पाटील, डॉ. धीरज चव्हाण, विक्की राजपूत, डॉ.मंदार पंडीत, सिताराम महाजन, किरण सैंदाणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यादरम्यान विविध बचत गटांची त्यांच्या मालाच्या विक्रीतून २ कोटी ६० लाखांची उलाढाल झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू यांना ग्राहकाची विक्रमी दाद या आर्थिक उलाढालीतून यंदा मिळाली. याठिकाणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल, खान्देश पर्यटनाचे दालन तसेच ॲक्युपंचर शिबीर विशेष आकर्षण ठरले.
समारोपप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे शाहीर सुमित धुमाळ व सहकारी यांनी छत्रपती संभाजीराजे पोवाडा सादर करत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. यानंतर पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, अप्पर कोषागार अधिकारी कैलास सोनार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, सागर पगारीया, दिपक जोशी, मंगेश पाटील, अभिषेक बोरसे, आकाश भावसार, मंगेश पाटील, भूषण खंबायत यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.