जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. हा मृतदेह एका तृतीयपंथीयाचा असून, प्रेमसंबंधासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून पहूर येथील एका तरुणाने त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील ऊर्फ गोलू अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला अटक केली आहे.
ओळख पटवणे होते मोठे आव्हान..
४ फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्याने मृतदेहाचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला होता. घटनास्थळी मोबाईल रेंज नसल्याने आणि मानवी वर्दळ नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून अंगावरील कपडेही काढून टाकण्यात आले होते.
नेलपॉलिश आणि ‘मुर्नी’ने दिला तपासाला दिशा..
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि नाकातील सोन्याची ‘मुर्नी’ हे तपासातील महत्त्वाचे धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट केले. या तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, हा मृतदेह आकांक्षा ऊर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे समोर आले.
असा घडला गुन्हा..
मयत आकांक्षा आणि संशयित स्वप्नील पाटील यांच्यात परिचय होता. आकांक्षा ही स्वप्नीलकडे प्रेमसंबंधासाठी सतत तगादा लावत होती, ज्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वप्नीलने तिला पद्मालय येथे गणपती दर्शनाच्या बहाण्याने नेले. दर्शन झाल्यानंतर त्याने तिला जंगलात नेऊन तिच्या डोक्यात वार केले आणि ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याने तिचे कपडे काढून दुचाकीतील पेट्रोल ओतून मृतदेह जाळला.
पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे स्वप्नीलला ताब्यात घेतले असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, ईश्वर पाटील आणि विनोद पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.








